अब्द

धडपड करणारे एक अनियतकालिक पत्र ('पत्रकारिता' या शब्दामधील 'पत्र' ही अक्षरं ज्या अर्थाची, त्या अर्थाने पत्र)

'दुसरा ब्लॉग' येथे पाहता येईल.

कॉपी नको

Protected by Copyscape plagiarism checker - duplicate content and unique article detection software.

अब्द मैत्र

Tuesday 5 January 2010

अब्द

अब्द म्हणजे एक वर्ष.
अब्द म्हणजे ढग.
अब्द म्हणजे संपृक्त.
अब्द म्हणजे अर्थपूर्ण.

अर्थ परिपूर्ण आहे, असं कसं म्हणता येईल.
अब्द परिपूर्ण आहे, असं कसं म्हणता येईल.

५ जानेवारी २००९ आणि ५ जानेवारी २०१० यांच्या मध्ये एक अब्द.

काय लिहिलं? काय राहिलं?
खूप राहिलं.

पण एक 'अब्द' घडलं, एवढं खरं.

Wednesday 30 December 2009

फोटोंची फाईल आणि मिल्टन आजोबांचा वाढदिवस

फोटोग्राफीविषयी 'अब्द'वर फार काही प्रसिद्ध करता आलं नाही बरेच दिवसांत. पण नुकतंच फोटोग्राफीविषयी वेगळं काम करणारं एक संकेतस्थळ सापडलं, morgueFile  नावाचं.
मायकल कॉनर्स नावाच्या अमेरिकेतल्या माणसाला ही कल्पना सुचली आणि तो व त्याचा भाऊ केविन यांनी एकत्र येऊन हे काम सुरू केलं. जोहानस सीमन हा त्यांचा अजून एक सहकारी.
morgueFile ही एक ऑनलाईन फाईल आहे जिथे अनेक छायाचित्रं संग्रहीत करून ठेवल्येत. या फायलीत विषयवार फोटो साठवून ठेवलेत. त्यांचा फुकट वापर करण्याची सोय आहे. अशी बरीच संकेतस्थळं आहेत खरंतर, पण morgueFileच्या निमित्ताने त्याची नोंद केली कारण morgueFileवाल्यांचं वैशिष्ट्य हे की, इतर संकेतस्थळांची यादीही इथे दिलेय.
शिवाय, इथे वेगवेगळे लोक त्यांचं काम प्रसिद्ध करू शकतात. ते इतरांना वापरण्यासाठी उपलब्ध करून देऊ शकतात. वेगवेगळे प्रकल्प हे लोक राबवतात. सामाजिक कामांना मदत करण्यासाठी पुस्तकं काढतात. कम्युनिट्या तयार करून एकमेकांच्या कामावर चर्चा करतात. असं काय काय करतात.
***

morgueFileवरच्या अनेक छायाचित्रांमधलं हे एक इथे प्रसिद्ध केलंय ते आपल्या 'अब्द'तल्या 'अ' साठी.
अल्विमान नावाच्या माणसाने काढलेलं हे छायाचित्र आहे.











***
सहज, ३० डिसेंबरला फोटोग्राफीशी संबंधित इतिहासात काय घडलं ते बघितलं तर १९०९ साली मिल्टन रोगोवीन या डॉक्युमेंटरी फोटोग्राफरचा जन्म झालेला सापडेल. ह्या माणसाने खूपंच मोठं काम करून ठेवलंय. ही पोस्ट १०० वर्षांच्या मिल्टन आजोबांना वाढदिवसाच्या शुभेछांसह. त्यांचं काम बघण्यासाठी पुढील संकेतस्थळावर जावे:
MILTON ROGOVIN
***

Sunday 27 December 2009

२४ डिसेंबर

तीन दिवसांपूर्वी म्हणजे २४ डिसेंबरला साने गुरुजींची एकशेदहावी जयंती झाली. भाषा वैविध्य, भाषेचा वापर आणि एकूणच भाषेच्या बाबतीत भलताच जागरूक असलेला हा माणूस होता. 'आंतरभारती' सारखी संकल्पना मांडलेल्या साने गुरुजींच्या जयंतीच्या निमित्ताने भाषेच्या संदर्भातील दोन चांगल्या कामांची इथे नोंद करावीशी वाटली.

जगात दर दोन आठवड्यांमागे एक भाषा मरते. मग काय करायचं? आपण काहीच करायचं नाही, पण National Geographicवाले आणि Living Tongues Institute for Endangered Languages यांनी एकत्र येऊन एक प्रकल्प सुरू केलाय. हे लोक जगभर मरत असलेल्या भाषांची चिंता करत, त्या भाषांचं दस्तावेजीकरण करण्याचा प्रयत्न करतात, त्या भाषा टिकवण्यासाठी काही करायचा प्रयत्न करतात, त्या भाषांचा भौगोलिक, जैविक संदर्भात अभ्यास करतात. आणि काय काय करतात त्याची माहिती खाली दिलेल्या संकेतस्थळावर गेल्यास मिळेल -
Enduring Voices Project, Endangered Languages, Map, Facts, Photos, Videos -- National Geographic

रामदास भटकळांनी रायगडला 'साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट'च्या सहकार्याने 'अनुवाद सुविधा केंद' नावाची एक गोष्ट सुरू केलेय, तिचाही उल्लेख इथे करून ठेवूया. त्याची काही माहिती 'सत्तरीतली सळसळ' ह्या 'महाराष्ट्र टाईम्स'मध्ये आलेल्या भटकळांच्या मुलाखतीत मिळेल. आणि उरलेली माहिती 'साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट'च्या संकेतस्थळावर  मिळेल.

ज्या काळात लोक एकमेकांच्या कानाखाली आवाज काढून, पुतळे उभारून आणि प्रचारी थाटाचे चित्रपट काढून भाषेचा अभिमान दाखवतात आणि 'भाषिक अस्मिता' सारखे शब्द वापरून त्यांना जागवण्यासाठी भाषणं देत आणि ऐकत बसतात, त्या काळात अशा कामांबद्दल बोलायचं म्हणजे भाबडेपणाच म्हणायला हवा, 'श्यामच्या आई'तल्या संस्कारांच्या उपदेशांसारखा (?).


साने गुरूजी
(२४. १२. १८९९- ११. ६. १९५०)
***

Sunday 20 December 2009

श्री. दा. पानवलकर

श्री. दा. पानवलकर- सांगलीचा माणूस, मुंबईत कस्टम्समध्ये नोकरीत होता. एकदम उंचापुरा माणूस. काय काय कथा लिहिल्या! त्यांच्या 'सूर्य' नावाच्या कथेवर विजय तेंडुलकरांनी पटकथा लिहिली, त्यावर गोविंद निहलानीने 'अर्धसत्य' नावाचा हिंदी चित्रपट काढला, त्यामध्ये ओम पुरीने नायकाची भूमिका केली, आपली स्मिता पाटील त्यात होती. पानवलकरांना उत्कृष्ट कथेचं 'फिल्मफेअर' पारितोषिक मिळालं. चित्रपटाच्या शूटिंगच्यावेळेला उपस्थित राहून, सगळं बघत बघत पानवलकरांनी एक पुस्तक लिहिलं 'शूटिंग' नावाचं. 'अर्धसत्य' मधेमधे टीव्हीवर दाखवतात. 'शूटिंग' आता आऊट ऑफ प्रिंट झालेलं पुस्तक आहे.

एक आपली सुरुवात करायची म्हणून 'शूटिंग'ने केली. बाकीची त्यांच्या कथांची पुस्तकं, 'एका नृत्याचा जन्म', 'जांभूळ', 'सूर्य', 'औदुंबर', 'कांचन', 'चिनाब', 'गजगा'.  'सूर्य' आणि 'औदुंबर'च्या नव्या आवृत्त्या काढल्या होत्या मधे 'मौज'वाल्यांनी. बाकीची गायब, म्हणजे आऊट ऑफ प्रिंट. एक 'साहित्य अकादमी'वाल्यांनी काढलंय, 'श्री. दा. पानवलकर यांची कथा' नावाचं, ते मिळतं बहुतेक अजून. 

पानवलकर म्हणजे, एकदा कथा सुरू झाली की तुम्ही एकदम घटनास्थळीच. जबरदस्त उपमा. लयीत प्रवास करणारी कथनशैली. वाचली की, ती कथा तुमच्या डोक्यात घुमत राहाणार. थेट एकदम. ती कथा तुम्हाला 'दिसणार', सगळे रंग, वास, माणसं, घरं असं सगळंच. म्हणजे एखादी कथा सेपीया टोन  मध्ये दिसेल किंवा अशी वेगवेगळ्या छटांमध्ये. त्यांची कथा म्हणजे नैसर्गिक सुंदर, उगीच बनावट कारागिरी नाही, खोटे दागिने नाहीत. कसले कसले विषय! सगळंच एकदम काबीज करणारंच. काय त्याला दुसरा शब्द नाही, एकदम काबीज करणा-या कथा.

तेंडुलकरांनी 'औदुंबर' नावाचा एक लेख लिहिला होता पानवलकरांवर. तो आता 'हे सर्व कोठून येते' (राजहंस प्रकाशन) या पुस्तकात आहे.


श्री. दा. पानवलकर
***
                                                             

Friday 11 December 2009

भीती आणि भिंती

- संजय हळदीकर

(संजय हळदीकर एक प्रकारचं काम करतात, त्यासंबंधीचे उल्लेख खालील लेखात आहेत, त्यामुळे वेगळा उल्लेख करत नाही. त्यांच्या कामाच्या अनुषंगाने त्यांनी एक प्रयोग केला, जो साहित्याच्या साध्या-सरळ  बाजूकडे लक्ष देतो. त्या प्रयोगाकडे आपलं लक्ष जावं, यासाठी हळदीकरांना 'अब्द'साठी लिहायची विनंती केली, त्यांनी संमती दिली आणि लेख पाठवला. तो प्रसिद्ध करत आहे- अब्द.)

'भीती आणि भिंती'... मुलांचं एक वेगळं भावविश्व. असं भावविश्व जे त्यांच्या वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीनुसार बदलत जातं. त्याबरोबरच त्यांची मानसिकताही उलगडत जाते. आदिवासी पाडे, अनाथालये, रिमांड होम, वेश्यावस्ती इथे राहाणारी ही मुलं समाजाकडे कुठल्या दृष्टीने बघत असतील? काय फरक असू शकतो त्यांच्या जाणिवांत? सुसंस्कृत समजला जाणारा समाज त्यांना कसा वाटतो? कशी असेल त्यांची विचार करण्याची पद्धत, त्यांची मानसिकता? या सा-या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आणि भोवतालच्या वातावरणामुळे दबलेल्या त्यांच्यातल्या सुप्तगुणांना शक्य तितकी चालना देण्याचा प्रयत्न म्हणजे महाराष्ट्रभर ठाणे, सोलापूर, मुंबई, पंढरपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी मुलांसाठी घेतलेल्या कार्यशाळा.

या कार्यशाळांमधली मुलं आणि मुख्य प्रवाहातली मुलं वयाने सारखीच, पण मनाने...?
प्रशिक्षक या नात्याने मी जेव्हा ह्या मुलांच्यात मिसळलो, वावरलो, त्यांच्यातला एक होऊन गेलो, तेव्हा सुरुवातीला संकोचाने दबलेली ही मुलं हळूहळू मोकळी होत गेली. ती जसजशी व्यक्त होत गेली तसतसा मी मात्र अस्वस्थ होत गेलो. आणि हीच अस्वस्थता थेट त्या मुलांच्याच शब्दात मांडलेय 'भीती आणि भिंती' या पुस्तकाच्या रुपात.

कार्यशाळेतल्या प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून मुलांना मी एक विषय दिला- 'भीती'. 'भीती' या विषयावर एखादं चित्र किंवा कविता करायची, असं त्याचं स्वरूप. यातून समोर आली, भीतीची वेगवेगळी रुपं आणि परिमाणं. ख-या अर्थाने हे फक्त जाणीवपूर्वक लिहिलेलं पुस्तक आहे का? तर, नाही. ह्या आहेत त्या मुलांच्या भावना, त्यांच्या कल्पना, त्यांची स्वप्नं, त्यांच्या आशा-निराशा, त्यांची सुख-दु:खं आणि शब्दांत न मांडता येण्यासारखं बरंच काही.

एका वेगळ्या जगात, भीतीच्या भिंतींमध्ये वावरणा-या मुलांचे अनुभव म्हणजे 'भीती आणि भिंती'.

- संजय हळदीकर
मोबाईल: ९८९०११२८०४
***
भीती आणि भिंती
संकल्पक- संजय हळदीकर
किंमत- ७० रुपये.
प्रकाशक- विजया पाटील
मुक्ता पब्लिशिंग हाऊस,
'विमल विहार', १५५७/ ई, तिसरी गल्ली,
राजारामपुरी, कोल्हापूर- ४१६००८.
दूरध्वनी: (०२३१) २५२२८२८.
***
'भीती आणि भिंती'मधली एक कविता:

मला भीती वाटत नाही हो
मी कशालाबी भीत नाही हो
आणि मला कोणी ही भीती
दाखवत नाही हो
भीती दाखवली तरी
दत्तात्रय भिणार नाही हो
आणि मी भितो केव्हा?
जर कोणी वारलं तर
तेव्हाच दत्तात्रयाला भीती वाटते हो
दत्तात्रय तेवढ्याला भितो आणि 
दुस-या कशाला भीत नाही हो
- दत्तात्रय बापू शिरोळे, कोल्हापूर.
***
(लेख लिहून दिल्याबद्दल हळदीकरांचे आभार.)

Thursday 10 December 2009

दिलीप चित्रे गेले

दिलीप पुरुषोत्तम चित्रे गेले.

'The Little Magazine'मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या एका कवितेची लिंक देतो- Frescoes

'Tehelka'मध्ये आलेला त्यांचा एक लेख- The city of my first and last love

एक चित्र्यांविषयी वाचण्यासारखं- Portrait of an artist

हेसुद्धा पाहाता येईल- Dilip Chitre and His Painting



दिलीप चित्रे
***
   (दिलीप चित्रे यांचे छायाचित्र इंटरनेटवरून घेतले आहे.)

Wednesday 9 December 2009

भाऊ पाध्यांना कोणी मारलं?

आता तसं भाऊ पाध्ये वारले ते कधीतरी १९९६च्या ऑक्टोबर/ नोव्हेंबरमध्ये. नक्की कसे गेले माहीत नाही, पण सत्तरच्या आसपास वय झालंच होतं आणि ८९ साली अर्धांगवायू झाल्यामुळे अपंगत्व आलं होतं. म्हणजे मुद्दामहून त्यांना कोणी मारलेलं नाही. पण मुद्दा आहे तो, वारल्यानंतर ते मराठी लोकांच्या मेंदूतून एवढे लवकर मेले कसे काय?
आणि 'विस्मृतीत गेले', 'आठवणीही उरल्या नाहीत' असे काहीतरी शब्दप्रयोग करता येतील, पण ते तितके योग्य होणार नाहीत. मुख्य एकच की, भाऊ पाध्ये मेले. खरं म्हणजे 'आपण त्यांना का मारलं', असं लिहिणार होतो. पण तेही काही योग्य होणार नाही. कारण त्यांना जग मानवलं नाही म्हणून ते मेले, हेच खरं. दुसरं काय म्हणणार?

काहीतरी घोळ नक्कीच आहे, ज्यामुळे आपण आपल्या भाषेत, आपल्या आजूबाजूचं वास्तव दाखवणा-या माणसाकडे लक्षसुद्धा न देता कुठेतरी ढगात काही सापडतंय का ते बघत बसलोय. आता एक असं असणार की, वास्तव बघायचंच नाही मग उगीचच कोणी काहीही दाखवेल ते बघून टाळ्या वाजवत बसायचं. म्हणजे टाळ्या वाजवणा-यांनासुद्धा मजा आणि ज्याने ते काय ते दाखवलं त्यालासुद्धा मजा.

पण भाऊ पाध्ये ढोंगीपणा करत बसले नाहीत. त्यांना जे दिसलं, जसं दिसलं तसं त्यांनी, त्यांना योग्य वाटलं त्या पद्धतीने सांगितलं. उगीच दिसलं त्याला इकडून ठिगळ लाव, तिकडून पट्टी बांध, असेल धंदे ते करत बसले नाहीत. आणि आता कसं आहे, कशासाठी ते माहीत नसतानासुद्धा लोक इकडून तिकडून ठिगळ आणि पट्ट्या लावून फिरत असतात, त्यामुळे भाऊ पाध्ये दुर्लक्षित राहाणारच.

भाऊ पाध्ये आणि गोष्ट सांगण्याची कला यांची काहीतरी खास मैत्री आहे. गोष्ट कुठे आहे आणि ती कशी सांगायची हे त्यांच्याकडे एवढ्या सहजपणे येत असणार की त्याचं फक्त आश्चर्यच वाटून घ्यावं. बाकी काही विश्लेषण करणं अवघड आहे. त्यांनी भन्नाट आणि खरा आशय आणला, सरळ भाषा आणली आणि साहित्याला ढगातून उडविण्याऐवजी जमिनीवरून चालवलं.

अनेक सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, भाषिक संदर्भ असलेलं भाऊ पाध्यांचं लिखाण खरंतर आंतरविद्याशाखीय  अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय ठरावं. पण विद्या, अभ्यास आणि संशोधन या सगळ्यांमध्ये एवढं अंतर आहे की असली अपेक्षा हास्यास्पदच म्हणावी लागेल. नाही म्हणायला, शिवाजी विद्यापीठात वगैरे काहींनी भाऊ पाध्यांच्या साहित्यावर संशोधन केलंय. अजूनही कोणी केलं असू शकेल, किमान त्यामुळे ते कुठेतरी श्वास घेत राहातील. बरं संशोधन, अभ्यास राहिलं दूर. साधा, सरळ, स्पष्ट आनंद तरी घ्यालं की नाही, तर तेसुद्धा नाही. शेवटी काय, भाऊ पाध्ये लोकांपर्यंत पोचले नाहीत.


'राडा' कादंबरीची पहिली आवृत्ती प्रकाशित झाल्यानंतर झालेल्या गदारोळासंदर्भात भाऊ पाध्यांनी लिहीलं होतं- ''असं समजलं की, प्रकाशकाला शिवसेनेच्या मंडळींकडून दम बसला होता आणि त्यामुळे त्याने 'राडा'च्या प्रती बाजारात विकायला काढल्या नाहीत. ही पण एक सेन्सॉरशिपच आहे. अर्थात माझ्यासाठी कोण आवाज उठवणार म्हणा.''
बरोबर आहे, भाऊ पाध्यांसाठी कोण आवाज उठवणार म्हणा?

खरं म्हणजे भाऊ पाध्यांवर लिहू शकणारी अनेक खरीखुरी विद्वान माणसं कुठे कुठे (अजूनतरी) आहेत. पण हे कसं, मोकळं अंगण मिळालं म्हणून घेतलं आपलं नाचून. आणि एवढं नाचूनसुद्धा मुख्य प्रश्नाचं उत्तर सापडलेलंच नाही.  

अजून एक, कोणी असंही म्हणू शकेल की, हा एवढा बडबडतोय पण हा कोण भाऊ का खाऊ पाध्ये खरंच मोठा होता का? आणि होता असेल तरी त्याचा उपयोग काय?
असं म्हणणा-यांना समजावता येईलही कदाचित पण या प्रश्नाला 'ट्विटर'सारखं १४० कॅरेक्टर्समध्ये काय उत्तर देणार?
***


भाऊ पाध्ये
***

Blog Archive

मराठी ब्लॉग विश्व

About Me

अवधूत / Avadhoot
Ratnagiri / Pune, Maharashtra, India
About me. . . About me?
View my complete profile