आता तसं भाऊ पाध्ये वारले ते कधीतरी १९९६च्या ऑक्टोबर/ नोव्हेंबरमध्ये. नक्की कसे गेले माहीत नाही, पण सत्तरच्या आसपास वय झालंच होतं आणि ८९ साली अर्धांगवायू झाल्यामुळे अपंगत्व आलं होतं. म्हणजे मुद्दामहून त्यांना कोणी मारलेलं नाही. पण मुद्दा आहे तो, वारल्यानंतर ते मराठी लोकांच्या मेंदूतून एवढे लवकर मेले कसे काय?
आणि 'विस्मृतीत गेले', 'आठवणीही उरल्या नाहीत' असे काहीतरी शब्दप्रयोग करता येतील, पण ते तितके योग्य होणार नाहीत. मुख्य एकच की, भाऊ पाध्ये मेले. खरं म्हणजे 'आपण त्यांना का मारलं', असं लिहिणार होतो. पण तेही काही योग्य होणार नाही. कारण त्यांना जग मानवलं नाही म्हणून ते मेले, हेच खरं. दुसरं काय म्हणणार?
काहीतरी घोळ नक्कीच आहे, ज्यामुळे आपण आपल्या भाषेत, आपल्या आजूबाजूचं वास्तव दाखवणा-या माणसाकडे लक्षसुद्धा न देता कुठेतरी ढगात काही सापडतंय का ते बघत बसलोय. आता एक असं असणार की, वास्तव बघायचंच नाही मग उगीचच कोणी काहीही दाखवेल ते बघून टाळ्या वाजवत बसायचं. म्हणजे टाळ्या वाजवणा-यांनासुद्धा मजा आणि ज्याने ते काय ते दाखवलं त्यालासुद्धा मजा.
पण भाऊ पाध्ये ढोंगीपणा करत बसले नाहीत. त्यांना जे दिसलं, जसं दिसलं तसं त्यांनी, त्यांना योग्य वाटलं त्या पद्धतीने सांगितलं. उगीच दिसलं त्याला इकडून ठिगळ लाव, तिकडून पट्टी बांध, असेल धंदे ते करत बसले नाहीत. आणि आता कसं आहे, कशासाठी ते माहीत नसतानासुद्धा लोक इकडून तिकडून ठिगळ आणि पट्ट्या लावून फिरत असतात, त्यामुळे भाऊ पाध्ये दुर्लक्षित राहाणारच.
भाऊ पाध्ये आणि गोष्ट सांगण्याची कला यांची काहीतरी खास मैत्री आहे. गोष्ट कुठे आहे आणि ती कशी सांगायची हे त्यांच्याकडे एवढ्या सहजपणे येत असणार की त्याचं फक्त आश्चर्यच वाटून घ्यावं. बाकी काही विश्लेषण करणं अवघड आहे. त्यांनी भन्नाट आणि खरा आशय आणला, सरळ भाषा आणली आणि साहित्याला ढगातून उडविण्याऐवजी जमिनीवरून चालवलं.
अनेक सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, भाषिक संदर्भ असलेलं भाऊ पाध्यांचं लिखाण खरंतर आंतरविद्याशाखीय अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय ठरावं. पण विद्या, अभ्यास आणि संशोधन या सगळ्यांमध्ये एवढं अंतर आहे की असली अपेक्षा हास्यास्पदच म्हणावी लागेल. नाही म्हणायला, शिवाजी विद्यापीठात वगैरे काहींनी भाऊ पाध्यांच्या साहित्यावर संशोधन केलंय. अजूनही कोणी केलं असू शकेल, किमान त्यामुळे ते कुठेतरी श्वास घेत राहातील. बरं संशोधन, अभ्यास राहिलं दूर. साधा, सरळ, स्पष्ट आनंद तरी घ्यालं की नाही, तर तेसुद्धा नाही. शेवटी काय, भाऊ पाध्ये लोकांपर्यंत पोचले नाहीत.
'राडा' कादंबरीची पहिली आवृत्ती प्रकाशित झाल्यानंतर झालेल्या गदारोळासंदर्भात भाऊ पाध्यांनी लिहीलं होतं- ''
असं समजलं की, प्रकाशकाला शिवसेनेच्या मंडळींकडून दम बसला होता आणि त्यामुळे त्याने 'राडा'च्या प्रती बाजारात विकायला काढल्या नाहीत. ही पण एक सेन्सॉरशिपच आहे. अर्थात माझ्यासाठी कोण आवाज उठवणार म्हणा.''
बरोबर आहे, भाऊ पाध्यांसाठी कोण आवाज उठवणार म्हणा?
खरं म्हणजे भाऊ पाध्यांवर लिहू शकणारी अनेक खरीखुरी विद्वान माणसं कुठे कुठे (अजूनतरी) आहेत. पण हे कसं, मोकळं अंगण मिळालं म्हणून घेतलं आपलं नाचून. आणि एवढं नाचूनसुद्धा मुख्य प्रश्नाचं उत्तर सापडलेलंच नाही.
अजून एक, कोणी असंही म्हणू शकेल की, हा एवढा बडबडतोय पण हा कोण भाऊ का खाऊ पाध्ये खरंच मोठा होता का? आणि होता असेल तरी त्याचा उपयोग काय?
असं म्हणणा-यांना समजावता येईलही कदाचित पण या प्रश्नाला 'ट्विटर'सारखं १४० कॅरेक्टर्समध्ये काय उत्तर देणार?
***
भाऊ पाध्ये
***